Saturday, July 26, 2008

मनाचिये गुंती

मन हे देवाने मानवाला दिलेली देणगीच म्हणावी लागेल. या मनाचा संचार सर्वत्र पूर्ण आयुष्यभर चालत असतो. अनिर्बंध, अनिवार, अमाप विचारांचे प्रवाह या मनात प्रवाहित होत असतात. सुखदुःख, चीड, द्वेष, आनंद, अशा अगणित भावनांचे भांडार या मनात दडलेले असते. मनाचा वेग तर प्रकाशाच्या वेगाहूनही अधिक असतो.

आपल्या कामात मनाचा सहभाग असेल तर ते काम जास्त चांगल्या रीतीने पार पडतं. मनाचा निश्चय झाला, तर कुठलेही अवघड काम करताना भीती वाटन नाही. जर मनाला आज्ञा दिली, की मला लवकर उठायचं आहे, तर मन आपल्याला ठरलेल्या वेळेपेक्षा थोडं आगोदर उठवतं. आपणच आळसाने लोळत पडतो.

रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं शरीर मेंदूची आज्ञा बिनबोभाट पाळत असतं. रोजची कामं सवयीने आपण करतो. पण ज्या कामात आपलं मन रमतं, ते काम आपल्याला आनंद देतं. संगीत, नाट्य, चित्र, शिल्प, इत्यादि कलांचा आस्वाद पूर्णपणे घ्यायचा असेल, तर मनाचा सहभाग असणं अत्यंत आवश्यक आहे. मनाचा सहभाग सारखा खंडित होत असतो. अस्थिरता तर मनाला मिळालेला शापच आहे जणु. सतत विचारांची मालिका आपल्या मनाच्या पडद्यावर चालू असते. इतक्या कार्यक्षम मनाला एकाग्र करणं फारच कठीण काम आहे.

योग, प्राणायामाच्या सहाय्याने ही एकाग्रता वाढवण्याचा प्रयत्न केला तर मनातल्या सर्व विकारांचा समतोल साधता येईल. मनातल्या नकारात्मक भावना, न्यूनगंड दूर होऊन जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोण सकारात्मक होईल. मनाचा समतोल राखणे शक्य होईल.

मन ही देवता, मन हा ईश्वर
मन से बडा न कोई

मन हेच ईश्वर आहे. त्याच्याशी प्रामाणिक राहील त्याचे आयुष्य सार्थकी लागेल.
Page copy protected against web site content infringement by Copyscape