Wednesday, December 31, 2008

रम्य सकाळ

उगवला रविकर हा गगनी
उजळली सर्वांगी अवनी

आला आला खट्याळ वारा
सुगंधित करी परिसर सारा

कुणी शुभांगी गुणगुणत मनी
सडा घालते पहा अंगणी

रेखुनी सुंदर रंगावली
रंग भरुनी तिला सजवली

या अशा प्रसन्न वेळी
पाऊले हरीची दारी थबकली

Sunday, October 5, 2008

एक प्रसन्न सकाळ

अहाहा! काय मस्त पाऊस पडतोय बाहेर!
आज रविवार कशाची घाई नाही. बाहेर रात्रीपासून पावसाची रिमझिम सुरुच आहे. सकाळी उठल्यावर पहिला विचार मनात आला की आजची सुट्टी मस्त खावुन-पिवुन पावसाचा आनंद घेत उपभोगायची. लगेच आज काय काय करायचे याचे विचार मनात सुरु झाले. मन तर असं चंचल नं, की एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याचे विचर सुचु लागतात.
मग मनाला म्हटलं, "जरा गप्प बस की! मला ठरवू दे कहीतरी. आधी मस्त कॉफी कर."
मोठा कप भरुन कॉफी करुन घेतली आणि बसले गॅलरीत पावसाची मजा घेत, पावसाचं क्षणोक्षणी बदलणारं रूप पाहत. झाडांवरुन, पानांवरुन थेंब सरसर खाली येत होते, जणु मोत्यांची माळच कुणी ओवत आहे! झाडाची पानं अगदी स्वच्छ अंघोळ केल्यासारखी पावसाने सुस्नात झाली होती. एक वेगळंच हिरव्या रंगाचं तेज पहायला मिळालं.
कॉफी संपली.
चला आता काहीतरी खायला करु असा विचार केला अन चटकन पोहे करावे म्हणजे जास्त वेळ न जाता मनमुराद आराम करता येईल. परत अस्मादिक पोह्याची बशी हातात घेऊन गॅलरीत स्थानापन्न.
खरंच. अशी सुट्टी फारच क्वचित उपभोगायला मिळते नाही? पावसाचा आनंद घरबसल्या मिळाला नं की त्यातला मज़ा काही औरच! ह्यावर्षी सारखं मनात येत होतं, की कुठेतरी पावसाळी सहलीला जावं. पण मध्यंतरी पावसानी इतकी दडी मारली की वाटलं, परत उन्हाळाच सुरु झाला की काय?
पण ह्या निसर्गराजाला आली दया आणि झाली सुरु पुन्हा मेघांची बरसात. पोहे खाता खाता मन तर कोकणात फिरुनही आलं.
मनाचं आपलं बरं असतं. त्याला फिरायला पैसा, वेळ, वगैरे कहीच लागत नाही. क्षणात ते घरात असतं तर दुसयाच क्षणी कुठे फिरुन येईल ते सांगता येत नाही.
असो.
आपल्याला देवाने मन दिलंय म्हणुन तर आपण आनंदाची अनुभुती घेऊ शकतोय!
अरेच्च्या! पहा. मन बेट परत गंभीरतेकडे वळायला लागलंय. त्याला जरा ताकीद देते आणि येतेच हं परत तुमच्याशी गप्पा मारायला.

Saturday, July 26, 2008

मनाचिये गुंती

मन हे देवाने मानवाला दिलेली देणगीच म्हणावी लागेल. या मनाचा संचार सर्वत्र पूर्ण आयुष्यभर चालत असतो. अनिर्बंध, अनिवार, अमाप विचारांचे प्रवाह या मनात प्रवाहित होत असतात. सुखदुःख, चीड, द्वेष, आनंद, अशा अगणित भावनांचे भांडार या मनात दडलेले असते. मनाचा वेग तर प्रकाशाच्या वेगाहूनही अधिक असतो.

आपल्या कामात मनाचा सहभाग असेल तर ते काम जास्त चांगल्या रीतीने पार पडतं. मनाचा निश्चय झाला, तर कुठलेही अवघड काम करताना भीती वाटन नाही. जर मनाला आज्ञा दिली, की मला लवकर उठायचं आहे, तर मन आपल्याला ठरलेल्या वेळेपेक्षा थोडं आगोदर उठवतं. आपणच आळसाने लोळत पडतो.

रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं शरीर मेंदूची आज्ञा बिनबोभाट पाळत असतं. रोजची कामं सवयीने आपण करतो. पण ज्या कामात आपलं मन रमतं, ते काम आपल्याला आनंद देतं. संगीत, नाट्य, चित्र, शिल्प, इत्यादि कलांचा आस्वाद पूर्णपणे घ्यायचा असेल, तर मनाचा सहभाग असणं अत्यंत आवश्यक आहे. मनाचा सहभाग सारखा खंडित होत असतो. अस्थिरता तर मनाला मिळालेला शापच आहे जणु. सतत विचारांची मालिका आपल्या मनाच्या पडद्यावर चालू असते. इतक्या कार्यक्षम मनाला एकाग्र करणं फारच कठीण काम आहे.

योग, प्राणायामाच्या सहाय्याने ही एकाग्रता वाढवण्याचा प्रयत्न केला तर मनातल्या सर्व विकारांचा समतोल साधता येईल. मनातल्या नकारात्मक भावना, न्यूनगंड दूर होऊन जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोण सकारात्मक होईल. मनाचा समतोल राखणे शक्य होईल.

मन ही देवता, मन हा ईश्वर
मन से बडा न कोई

मन हेच ईश्वर आहे. त्याच्याशी प्रामाणिक राहील त्याचे आयुष्य सार्थकी लागेल.

Wednesday, April 9, 2008

स्वागत नववर्षाचे

आज गुढीपाडवा. चैत्र प्रतिपदा याच दिवशी ब्रह्म्देवाने सृष्टीची रचना केली.ब्रह्मदेवाच्या या कृतीचे स्वागत गुढी उभारुन करतात. ब्रह्मदेवाच्या कर्तृत्वाचे प्रतिक म्हणुन या गुढीला ब्रह्मध्वज असेही म्हण्तात. १४ वर्षांचा वनवास संपवून याच दिवशी श्रीराम अयोध्येला परत आले. त्यांच्या आगमनाच्या आनंदोत्सव गुढी उभारुन साजरा करतात.
या चैत्राचे आणखी एक महत्व म्हणजे हा वसंत ऋतुचा महिना. शिशिराची पानगळ संपून झाडांना, वृक्षांना नवी पालवी फ़ुटते. कोवळ्या पालवीतून निसर्गाची कोमलता आपल्याला वेगळाच आनंद देते आम्रतरुवर मोहोर फ़ुलतो. कोकीळ गोड स्वरात गात असतो.सर्वत्र आल्हाददायक वातावरण असतं.
वर्षप्रतिपदे पासून ९ दिवस जागोजागी रामजन्मोत्सव साजरा करतात. सर्वत्र मंगलमय,भक्तीमय वातावरण असतं.ऋतुबदलाचा हा काळ असल्याने शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढावी म्हणुन गुढीपाडव्याला कडुलिंबाची फ़ुलं,पानं,हिंग,गूळ,चिंच व मीठ यांची चटणी करुन सकाळी खातात.सहा रसांच सेवन केलं जात.
आपण सर्व नववर्षाचे स्वागत करुया. हे नविन वर्ष सर्वांना सुखाचे समृद्धिचे व आनंदाची प्रगतीचे जावे अशी ईश्वर चरणी प्रार्थना करु.

Thursday, March 27, 2008

स्वप्न

स्वप्न म्हणजे काय असतं?
नकळत
सारं दिसत
सुप्त
मनाचा
मुक्तपणे
विहार असतो

स्वप्न म्हणजे सुप्त मनाने
जागेपणी
केलेले अवलोकन
अनेक
अतर्क्य अनाकलनीय
घटनांचे दृश्यांचे चिंतन

स्वप्न असते झोपेत फ़ुलणारे
जाग
येताच विरणारे
आभासालाही
खरे मानणारे
मनाला
नेहमीच गुंगविणारे

स्वप्नांची ही मालिका
दृश्य
दाखविते मनात
जागृती
येताच ती
अदृश्य
होते क्षणात

Wednesday, January 16, 2008

निसर्ग आणि धरा

त्याचं अस्तित्वंच वेगळं. तो अत्यंत अनाकलनीय, सुंदर, मनस्वी. त्याचा वेग, आवेग - सर्वच उस्फूर्त आणि कोसळल्यासारखं. असा हा किमयागार आहे तरी कोण?..... सतत रूपं बदलणारा. क्षणोक्षणी आश्चर्यचकित करणारा. कधी ढगांचे ढोल वाजवीत तर कधी वीजांचा लखलखाट करीत कोसळणार्‍या पावसातून आवेशाने व्यक्त्त होणारा. कधी तप्त झळांनी सर्व प्राणीमात्रांना त्रस्त करणारा.

त्याची सर्वच रूपं कशी रसरसती! त्याचं शांत रूप खूपच लोभस, कोमल, मनाला आल्हाददायक वाटणारं, सौंदर्याने नटलेलं. म्हणून तर मानव नेहमी त्याच्या सानिध्यात जाण्यास उत्सुक असतो. त्याचं नटणं तरी किती विविधरंगी! फुलांचे, पानांचे किती वेगवेगळे आकार, रंग! एकाचं रूप दुसर्‍याहून निराळं. त्याचं शांत रूप जितकं सुखावणारं तितकंच त्याचं रौद्र रूप मनाला भयभीत करणारं. सागर, नद्या अतीवृष्टीने आपली मर्यादा सोडतात आणि पुराने गावंच्या गावं नष्ट होतात. तर कुठे अती उष्णतेने वणवा पसरतो.

अनिर्बंध असतो तो. त्याला मनस्वी स्वभावामुळे विविधप्रकारे व्यक्त होणं जमतं. सुंदर तर तो आहेच; तसाच गूढही आहे. आणि तू, त्याची सखी - त्याच्या मनस्वीपणाला पूर्ण सामर्थ्याने सहन करणारी. किती गं सहनशील तू? त्याचे वेग, आवेग सर्व किती लीलया झेलतेस तू! त्याने पर्जन्याच्या धारांतून बरसावं आणि तू शांतपणे अंतरीच्या गूढ गर्भी शक्य तेवढं जल शोषून साठवून ठेवावं. अगदीच अनावर झालं तरंच नकार देतेस. त्याने तप्त झळांनी भाजुन काढलं तरी तू सहन करतेस. तुझी सहनशीलतेची मर्यादा संपली तर मात्र तू ज्वालामुखीच्या रूपाने आपली असह्य उष्णता बाहेर टाकतेस. आणि परत त्याच्या अनावरतेला सामावून घेण्यास सिद्ध व सज्ज होतेस. त्याने केलेल्या जलसिंचनाने तृप्त होऊन हिरवाईचा शेला पांघरून परत त्यच्या स्वागतास प्रसन्नपणे सामोरी जातेस.

तुझ्याशिवाय त्याचं फुलणं अपुरं आहे आणि त्याच्या उत्कटतेशिवय तूही अपूर्णच आहेस की गं. जन्मोजन्मीचं अतूट नातं आहे तुमचं दोघांचं! मानवाला अन्न, वस्त्र, निवारा देतेस म्हणून तुला अवनि म्हणतात. सर्व सजीवांना आधार देते म्हणुन तुला धरा म्हणतात. सर्वांवर मातेसारखे प्रेम करतेस म्हणून तू वंदनीय आहेस, पूजनीय आहेस. हे धरणीमाते, हे निसर्गराजा, तुम्हाला शतश: प्रणाम!
Page copy protected against web site content infringement by Copyscape