Sunday, October 5, 2008

एक प्रसन्न सकाळ

अहाहा! काय मस्त पाऊस पडतोय बाहेर!
आज रविवार कशाची घाई नाही. बाहेर रात्रीपासून पावसाची रिमझिम सुरुच आहे. सकाळी उठल्यावर पहिला विचार मनात आला की आजची सुट्टी मस्त खावुन-पिवुन पावसाचा आनंद घेत उपभोगायची. लगेच आज काय काय करायचे याचे विचार मनात सुरु झाले. मन तर असं चंचल नं, की एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याचे विचर सुचु लागतात.
मग मनाला म्हटलं, "जरा गप्प बस की! मला ठरवू दे कहीतरी. आधी मस्त कॉफी कर."
मोठा कप भरुन कॉफी करुन घेतली आणि बसले गॅलरीत पावसाची मजा घेत, पावसाचं क्षणोक्षणी बदलणारं रूप पाहत. झाडांवरुन, पानांवरुन थेंब सरसर खाली येत होते, जणु मोत्यांची माळच कुणी ओवत आहे! झाडाची पानं अगदी स्वच्छ अंघोळ केल्यासारखी पावसाने सुस्नात झाली होती. एक वेगळंच हिरव्या रंगाचं तेज पहायला मिळालं.
कॉफी संपली.
चला आता काहीतरी खायला करु असा विचार केला अन चटकन पोहे करावे म्हणजे जास्त वेळ न जाता मनमुराद आराम करता येईल. परत अस्मादिक पोह्याची बशी हातात घेऊन गॅलरीत स्थानापन्न.
खरंच. अशी सुट्टी फारच क्वचित उपभोगायला मिळते नाही? पावसाचा आनंद घरबसल्या मिळाला नं की त्यातला मज़ा काही औरच! ह्यावर्षी सारखं मनात येत होतं, की कुठेतरी पावसाळी सहलीला जावं. पण मध्यंतरी पावसानी इतकी दडी मारली की वाटलं, परत उन्हाळाच सुरु झाला की काय?
पण ह्या निसर्गराजाला आली दया आणि झाली सुरु पुन्हा मेघांची बरसात. पोहे खाता खाता मन तर कोकणात फिरुनही आलं.
मनाचं आपलं बरं असतं. त्याला फिरायला पैसा, वेळ, वगैरे कहीच लागत नाही. क्षणात ते घरात असतं तर दुसयाच क्षणी कुठे फिरुन येईल ते सांगता येत नाही.
असो.
आपल्याला देवाने मन दिलंय म्हणुन तर आपण आनंदाची अनुभुती घेऊ शकतोय!
अरेच्च्या! पहा. मन बेट परत गंभीरतेकडे वळायला लागलंय. त्याला जरा ताकीद देते आणि येतेच हं परत तुमच्याशी गप्पा मारायला.
Page copy protected against web site content infringement by Copyscape