Saturday, July 26, 2008

मनाचिये गुंती

मन हे देवाने मानवाला दिलेली देणगीच म्हणावी लागेल. या मनाचा संचार सर्वत्र पूर्ण आयुष्यभर चालत असतो. अनिर्बंध, अनिवार, अमाप विचारांचे प्रवाह या मनात प्रवाहित होत असतात. सुखदुःख, चीड, द्वेष, आनंद, अशा अगणित भावनांचे भांडार या मनात दडलेले असते. मनाचा वेग तर प्रकाशाच्या वेगाहूनही अधिक असतो.

आपल्या कामात मनाचा सहभाग असेल तर ते काम जास्त चांगल्या रीतीने पार पडतं. मनाचा निश्चय झाला, तर कुठलेही अवघड काम करताना भीती वाटन नाही. जर मनाला आज्ञा दिली, की मला लवकर उठायचं आहे, तर मन आपल्याला ठरलेल्या वेळेपेक्षा थोडं आगोदर उठवतं. आपणच आळसाने लोळत पडतो.

रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं शरीर मेंदूची आज्ञा बिनबोभाट पाळत असतं. रोजची कामं सवयीने आपण करतो. पण ज्या कामात आपलं मन रमतं, ते काम आपल्याला आनंद देतं. संगीत, नाट्य, चित्र, शिल्प, इत्यादि कलांचा आस्वाद पूर्णपणे घ्यायचा असेल, तर मनाचा सहभाग असणं अत्यंत आवश्यक आहे. मनाचा सहभाग सारखा खंडित होत असतो. अस्थिरता तर मनाला मिळालेला शापच आहे जणु. सतत विचारांची मालिका आपल्या मनाच्या पडद्यावर चालू असते. इतक्या कार्यक्षम मनाला एकाग्र करणं फारच कठीण काम आहे.

योग, प्राणायामाच्या सहाय्याने ही एकाग्रता वाढवण्याचा प्रयत्न केला तर मनातल्या सर्व विकारांचा समतोल साधता येईल. मनातल्या नकारात्मक भावना, न्यूनगंड दूर होऊन जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोण सकारात्मक होईल. मनाचा समतोल राखणे शक्य होईल.

मन ही देवता, मन हा ईश्वर
मन से बडा न कोई

मन हेच ईश्वर आहे. त्याच्याशी प्रामाणिक राहील त्याचे आयुष्य सार्थकी लागेल.

Wednesday, April 9, 2008

स्वागत नववर्षाचे

आज गुढीपाडवा. चैत्र प्रतिपदा याच दिवशी ब्रह्म्देवाने सृष्टीची रचना केली.ब्रह्मदेवाच्या या कृतीचे स्वागत गुढी उभारुन करतात. ब्रह्मदेवाच्या कर्तृत्वाचे प्रतिक म्हणुन या गुढीला ब्रह्मध्वज असेही म्हण्तात. १४ वर्षांचा वनवास संपवून याच दिवशी श्रीराम अयोध्येला परत आले. त्यांच्या आगमनाच्या आनंदोत्सव गुढी उभारुन साजरा करतात.
या चैत्राचे आणखी एक महत्व म्हणजे हा वसंत ऋतुचा महिना. शिशिराची पानगळ संपून झाडांना, वृक्षांना नवी पालवी फ़ुटते. कोवळ्या पालवीतून निसर्गाची कोमलता आपल्याला वेगळाच आनंद देते आम्रतरुवर मोहोर फ़ुलतो. कोकीळ गोड स्वरात गात असतो.सर्वत्र आल्हाददायक वातावरण असतं.
वर्षप्रतिपदे पासून ९ दिवस जागोजागी रामजन्मोत्सव साजरा करतात. सर्वत्र मंगलमय,भक्तीमय वातावरण असतं.ऋतुबदलाचा हा काळ असल्याने शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढावी म्हणुन गुढीपाडव्याला कडुलिंबाची फ़ुलं,पानं,हिंग,गूळ,चिंच व मीठ यांची चटणी करुन सकाळी खातात.सहा रसांच सेवन केलं जात.
आपण सर्व नववर्षाचे स्वागत करुया. हे नविन वर्ष सर्वांना सुखाचे समृद्धिचे व आनंदाची प्रगतीचे जावे अशी ईश्वर चरणी प्रार्थना करु.

Thursday, March 27, 2008

स्वप्न

स्वप्न म्हणजे काय असतं?
नकळत
सारं दिसत
सुप्त
मनाचा
मुक्तपणे
विहार असतो

स्वप्न म्हणजे सुप्त मनाने
जागेपणी
केलेले अवलोकन
अनेक
अतर्क्य अनाकलनीय
घटनांचे दृश्यांचे चिंतन

स्वप्न असते झोपेत फ़ुलणारे
जाग
येताच विरणारे
आभासालाही
खरे मानणारे
मनाला
नेहमीच गुंगविणारे

स्वप्नांची ही मालिका
दृश्य
दाखविते मनात
जागृती
येताच ती
अदृश्य
होते क्षणात

Wednesday, January 16, 2008

निसर्ग आणि धरा

त्याचं अस्तित्वंच वेगळं. तो अत्यंत अनाकलनीय, सुंदर, मनस्वी. त्याचा वेग, आवेग - सर्वच उस्फूर्त आणि कोसळल्यासारखं. असा हा किमयागार आहे तरी कोण?..... सतत रूपं बदलणारा. क्षणोक्षणी आश्चर्यचकित करणारा. कधी ढगांचे ढोल वाजवीत तर कधी वीजांचा लखलखाट करीत कोसळणार्‍या पावसातून आवेशाने व्यक्त्त होणारा. कधी तप्त झळांनी सर्व प्राणीमात्रांना त्रस्त करणारा.

त्याची सर्वच रूपं कशी रसरसती! त्याचं शांत रूप खूपच लोभस, कोमल, मनाला आल्हाददायक वाटणारं, सौंदर्याने नटलेलं. म्हणून तर मानव नेहमी त्याच्या सानिध्यात जाण्यास उत्सुक असतो. त्याचं नटणं तरी किती विविधरंगी! फुलांचे, पानांचे किती वेगवेगळे आकार, रंग! एकाचं रूप दुसर्‍याहून निराळं. त्याचं शांत रूप जितकं सुखावणारं तितकंच त्याचं रौद्र रूप मनाला भयभीत करणारं. सागर, नद्या अतीवृष्टीने आपली मर्यादा सोडतात आणि पुराने गावंच्या गावं नष्ट होतात. तर कुठे अती उष्णतेने वणवा पसरतो.

अनिर्बंध असतो तो. त्याला मनस्वी स्वभावामुळे विविधप्रकारे व्यक्त होणं जमतं. सुंदर तर तो आहेच; तसाच गूढही आहे. आणि तू, त्याची सखी - त्याच्या मनस्वीपणाला पूर्ण सामर्थ्याने सहन करणारी. किती गं सहनशील तू? त्याचे वेग, आवेग सर्व किती लीलया झेलतेस तू! त्याने पर्जन्याच्या धारांतून बरसावं आणि तू शांतपणे अंतरीच्या गूढ गर्भी शक्य तेवढं जल शोषून साठवून ठेवावं. अगदीच अनावर झालं तरंच नकार देतेस. त्याने तप्त झळांनी भाजुन काढलं तरी तू सहन करतेस. तुझी सहनशीलतेची मर्यादा संपली तर मात्र तू ज्वालामुखीच्या रूपाने आपली असह्य उष्णता बाहेर टाकतेस. आणि परत त्याच्या अनावरतेला सामावून घेण्यास सिद्ध व सज्ज होतेस. त्याने केलेल्या जलसिंचनाने तृप्त होऊन हिरवाईचा शेला पांघरून परत त्यच्या स्वागतास प्रसन्नपणे सामोरी जातेस.

तुझ्याशिवाय त्याचं फुलणं अपुरं आहे आणि त्याच्या उत्कटतेशिवय तूही अपूर्णच आहेस की गं. जन्मोजन्मीचं अतूट नातं आहे तुमचं दोघांचं! मानवाला अन्न, वस्त्र, निवारा देतेस म्हणून तुला अवनि म्हणतात. सर्व सजीवांना आधार देते म्हणुन तुला धरा म्हणतात. सर्वांवर मातेसारखे प्रेम करतेस म्हणून तू वंदनीय आहेस, पूजनीय आहेस. हे धरणीमाते, हे निसर्गराजा, तुम्हाला शतश: प्रणाम!

Monday, December 17, 2007

आई

आई असते घराचे जागतेपण
तिच्या वावरण्याचे नसते दडपण
शांतपणे देते ती सर्वांना मनोबळ
तिलाच सांगु शकतो आपण मनातील खळबळ

ती असते समईतील वात
मनोभावे रमते ती प्रपंचात
तिचे असणे धरले जाते नेहमी गृहीत
पण नसणे मात्र जाणवते मनाला सदोदित

Saturday, December 1, 2007

स्त्री

स्त्री म्हणजे घराचे घरपण ही व्याख्या फार जुनी झाली. नुसत घरपण जपण हेच तिच कर्तव्य किंवा कर्तुत्व राहील नसून तिच्या कार्याची व्याप्ती वाढली आहे. पूर्वी तिच संपूर्ण जीवन नात्यांच्या बंधनात बांधलेल होत. जन्मत: ती मुलगी नंतर बहिण, पत्नी व नंतर मुलांची माता. या प्रत्येक नात्यात तिला अनेक बंधन आहेत पण तरीही ती सर्व बंधन स्वीकारुनही आजची स्त्री आपल्या हुशारीने, बुद्धीने व कार्याने आपले स्वतंत्र सन्माननीय स्थान जगात मिलावून दाखविते. स्त्री म्हणजे अनाकलनीय न उलगड्णार कोड आहे. ती भोळीभाबडी आहे तशीच चतूरही आहे. ती दवासारखी टवटवित हवेसारखी तरल आहे ती मनाने खंबीर आहे. तिच्यामुळेच घराच घरपण टिकतच पण त्याच बरोबार समाज टिकुन राहण्यास आवश्यक असलेले ऋणानुबंध ही तिच्याचमुळे द्रूढ होतात. एका नव्या जीवाला जन्म देण्याची क्षमता देवाने फक्त तिलाच बहाल केली आहे. ह्या नैसर्गिक देणगीने स्त्री ही जगातील सजीवात सर्वोच्च स्थानावर आहे म्हणूनच ती पूजनीय आहे. ती एका जिवालानूसता जन्म देत नाही तर त्याच पालनपोषण करून त्या जीवाला जगात माणुस म्हणुन जगण्यासाठी सक्षम करण्याचे मोठे कार्य ती सहजतेने करते स्त्रीच कार्यक्षेत्र आता विस्तारल आहे. मुलांच संगोपन, कुटुंबातील नातेसंबध जपणं वृध्दांची आजारी व्यक्तींची सेवा करणं,गरज असेल तर अर्थाजन करून पतील आर्थिक साथही ती देते हे सर्व करताना तिचं शारिरीक व आत्मिक दोन्ही बळ खर्च होत असतं पण ती हसतमुखाने सर्व आघाड्यांवर सतत काम करत असते.स्त्री भावनाप्रधान आहे म्हणुन बाळाला आई मिळते, सासुला चांगली सून मिळते पतीला चांगली सहचारिणी मिळते . समाजाच समृध्द रूप जगासमोर येत ती प्रत्येकच्या भावना जपण्याचा प्रयत्न करते वादविवाद,भांडण टाळण्याचा प्रयत्न करत असते तिच्या मनाचा समतोल चांगला साधला तर जिजाऊसारखी आदर्श माता जगासमोर येते तिच्या मनस्वीपणाचा अतिरेक झाला तर कैकेयीसारखी माता पहायला मिळते. क्षणात हसणारी, क्षणात रडणारी, थोड्या दु:खाने हळवी होणारी, कणखरपणे एखादा निर्णय घेणारी, अशी विविध रूप स्त्रीत दडलेली असतत. जगात सर्व काही माणूस मिळवू शकतो पण जन्मघेण्यसाथी एका स्त्रीची कुसच लागतेह्म्हणुनच स्त्रीला प्रथम वंदन करतात "मातृदेवोभव" स्त्री खरच एक अनाकलनीय व्यक्तीमत्व आहे

Saturday, November 17, 2007

नादब्रह्म

सप्त स्वर संगीताचे
भाव उकलती मनाचे
किमया या सात स्वरांची
निर्मिती होई नव रसांची

होता स्वरांचा झंकार
होई नादब्रह्म साकार
संगीताचे साकारणे
हे तो ईश्वराचे देणे

Friday, October 26, 2007

ब्लॉगचे हस्तांतरण

सप्रेम नमस्कार,

माझ्या आईच्या कवितांचा हा ब्लॉग दि. १९ मार्च २००७ मी रोजी सुरू केला. आईच्या कविता लोकांपर्यंत पोहोचाव्यात हा त्यामागील हेतू होता. आपल्यासारख्या रसिक वाचकांनी अधुन मधुन प्रतिक्रिया व्यक्त करून तो सफलही केला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. मध्यंतरी आईची प्रोफाईल तयार केली व तिने स्वत: या ब्लॉगमध्ये दोन कविताही लिहिल्यात. आता आई भारतात व मी भारताबाहेर असल्यामुळे, तिच्या कविता तिने प्रकाशित करणं जास्त सोयीस्कर आहे. आज या ब्लॉगची सूत्रे आईच्या हातात देताना मला अत्यंत आनंद होतोय. आईच्या कविता आता तिच्याच हस्ते प्रकाशित होतील याचा आनंद शब्दातीत आहे. तुम्हा सर्वांच्या साक्षीनं आईला मी अनेक शुभेच्छांसह हा ब्लॉग हस्तांतरित करीत आहे. या ब्लॉगवर असंच प्रेम करीत रहाल असा मला विश्वास आहे.
धन्यवाद.

-प्रशांत उदय मनोहर

Sunday, September 30, 2007

चार ओळी

मुक्त मी स्वच्छंद मी
बेभान मी स्वप्नील मी
या अशा उन्मुक्ततेला
उत्स्फूर्त तुझी साथ ही


फुले पारिजात पानोपानी
शुभ्र सडा पडे अंगणी
जणू स्वागता उषेच्या
अंथरला शुभ्र गालिचा


पहाट गुलाबी थंडीची
वाट धुक्यात हरवली
होता भानूचा उदय
मिळे सृष्टीलाच ऊब


मळभ येतसे अंबरी
आकाश डहुळे अंतरी
वीज कडकडाट करी
पडती पावसाच्या सरी

Monday, September 10, 2007

अर्चना

गजानना श्री गजवदना
नित करते मी तव अर्चना

सर्वांगी चर्चिला शेंदूर
माथी वाहियले दूर्वांकुर
जोडूनिया उभय कर
वंदन तुजला करीते मी

तुज आवडती शमी मंदार
जास्वंदीचे पुष्प मनोहर
लाडू मोदक आणिक खीर
नैवेद्य तूज दाविते मी

करी प्रार्थना तव चरणी
राही मन तव नामस्मरणी
प्रेमभावे अंतःकरणी
तव पदी लीन होते मी

होवो मज तव दर्शन
आतुरले हे माझे मन
गळून पडो माझे मीपण
हीच आस मनी धरिते मी

Sunday, September 2, 2007

मन आनंदाने नाचे

लाभे सान्निध्य निसर्गाचे
मन आनंदाने नाचे

वाट डोंगर दर्‍यांची
सर येई पावसाची
धुके पसरले दाट
दिसेनाशी झाली वाट
रम्य या निसर्गात मन आनंदाने नाचे

पाणी ठेविले धरणी बंधनी
तरी वाहे ते खळाळूनी
चिंब भिजती ग सारे
होती बेभान पाण्याने
विसरून बंधन वयाचे मन आनंदाने नाचे

क्षण लाभे आनंदाचा
पावसात भिजण्याचा
उमलती फुले विविधरंगी
सृष्टी हरित होई अंगी
पाहूनी ईश्वरी चमत्कार मन आनंदाने नाचे


-सौ. प्रतिमा उदय मनोहर

स्पर्श

स्पर्श सांगतो जीवाला
अर्थ खर्‍या भावनेचा
स्पर्शातून आईच्या
झरे झरा वात्सल्याचा

स्पर्श गुरू-आशिषाचा
देई आधार मनाला
स्पर्श घडवी दर्शन
अंतर्भावांचे मनाला

स्पर्श मूक सुहृदांचा
शांतवितसे मनाला
जे न सांगू शके वाणी
स्पर्श सांगे ते तत्क्षणी



-सौ. प्रतिमा उदय मनोहर

Saturday, September 1, 2007

प्रभात

झुंजुमुंजु झाल्या दिशा झाली पहाट पहाट
पक्षी करिती किलबिलाट धुक्यात हरवली वाट
त्या धूसर वाटेवरुनी चालत जाता दूरवर
दिसला चक्षुंना अपूर्व निसर्गाचा चमत्कार

वाट होती वळणांची डोंगरावर जाणारी
त्या पहाटवेळेला होती शांत सृष्टी सारी
जाता डोंगरमध्यावर दृष्य देखिले विलोभनीय
प्राचीला डोंगराआडून होत होता सूर्योदय

दूरवरी देवळात होत होता घंटानाद
पक्षी आनंदाने करिती मधुर नाद
होता हवेमध्ये तेव्हा सुखद गारवा खरा
शुद्ध वातावरणाचा आनंद मिळे न्यारा



-सौ. प्रतिमा उदय मनोहर

Monday, August 20, 2007

किमया श्रावणाची

आला श्रावण श्रावण महिना पाचवा वर्षाचा
महिना व्रतवैकल्याचा, उत्साहाचा अन् सणांचा

येती पावसाच्या सरी तृप्त होई मन धरित्री
पालवते सृष्टी सारी फुले अंगोपांगी खरी

खेळ ऊनपावसाचा महिना हर्ष उल्हासाचा
बहर येई फळाफुला सख्या झुलती ग झुला

धनु इंद्राचे आकाशी पखरण सप्तरंगाची
हिरवाईचा शेला अंगी पृथ्वी आनंदे पांघरी

श्रावणाच्या महिन्यात पृथ्वी तेजाने झळाळी
जणु गर्भिणीचे तेज चढे तिच्या अंगावरी


-सौ. प्रतिमा उदय मनोहर

Friday, July 13, 2007

आशेचा किरण

काळोखालाही असते प्रकाशाची झालर
नको मना निराश होऊ, आशेची कास धर

संध्याछायेचा खेळ नित्य चाले जीवनात
तरीही रोज होते प्रसन्न प्रभात

रात्रीच्या अंधारात सुख शांत झोपते
दुःख असता मात्र झोप चाळवते

रविकिरणांच्या चाहुलीने सकाळ तेजाळते
सर्व प्राणीमात्रांना ती कामाला लावते

दुःखमय जीवनी आशेचा एक किरण
उजळून टाकतो मनाचा कण अन् कण


-सौ. प्रतिमा उदय मनोहर
Page copy protected against web site content infringement by Copyscape